शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी १ जून रोजी गडचिरोली येथे रक्तदान करून रालीस सुरुवात केली.महाराष्ट्रातील विविध शहरांना-गावांना भेटी देत ते ४ जून रोजी मुंबईत पोहचले. त्याच दिवशी , ४ जून रोजी त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. शरीराची रक्तदान व प्रवासामुळे झालेली झीज भरून निघायच्या आधीच त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. देशाला अन्न पुरविण्यासाठी मातीत रक्त आटवूनही ज्याच्या जगण्याची दैना होते, ज्याची झीज होते त्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाच्या दगडी काळजापर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली. दि. 7 जून रोजी त्यांच्या उपोषणाचा ४थ दिवस होता. त्यांची तब्येत खालावली होती. वजन ३ किलोंनी कमी होऊन रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण कमी झाले. अशातच आ. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजयभाऊ जावंधिया यांनीही वर्धा येथे आमरण उपोषणास सुरुवात केली.
याच दिवशी राज्यभरात ठिकठिकाणी भजन व ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते व शेतकरी तहसील कार्यालयांबाहेर भजन करून शासनाला सद्बुद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली व तहसिल्दारांमार्फात मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पाठविले.चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, धुळे, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, जालना, बुलढाणा आदी जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांत हे आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे मुख्यमंत्री महोदयांनी 7 जुन रोजी दुपारी ४ वाजता आंदोलकांसोबत बैठक आयोजित केली. कोरडवाहू मिशन स्थापन करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच इतर मागण्यांसंदर्भात समिती स्थापन करून त्यात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ठेवण्याचे आदेश दिले. पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बलीराज्यासाठी महत्वाचे दान पदरात पडून घेत बच्चुभाऊ यांनी उपोषण मागे घेतले.






