शुक्रवार, ८ जुलै, २०११

श्रीमान राहुल गांधी, तुम्हाला लाज वाटत नाही काय ?

उत्तर प्रदेशाला दलाल चालवत आहेत, उत्तर प्रदेश सरकार शेतकरी हिताच्या विरोधात आहे अशा आशयाचे संदेश आजकाल राहुल गांधी देत आहेत. बरोबरही असेल कदाचित. पण, राहुल बाळा, हे एका शेंबड्या पोरानं दुसऱ्याला शेंबडा म्हणण्यासारख नाही का?

सारा कर्मचारी वर्ग सहाव्या वेतन आयोगाचे फायदे भोगत असताना आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लोक जागतिकीकरणाच्या फायद्यात चिंब भिजत असताना कोरडा राहिलाय तो फक्त शेतकरी आणि शेतमजूर. आणि शेतकऱ्यांच भलं करू शकणारा स्वामिनाथन आयोग वर्षनुवर्षे धूळ खात पडून राहतो. राजकुमार, किती दिवस स्टंटबाजी करत फिरणार ? आंतर राष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव सात हजाराच्या आसपास अन इथे हमीभाव तीन हजार? प्रहारच्या आंदोलनामुळे कशीबशी निर्यातबंदी हटली. कसाबसा शेतकरी जगायला लागला आणि तामिळनाडू, बंगालच्या निवडणुकांनी घात केला. ज्यांच्याकडून पैसा घेउन तुम्ही आणि तुमचे मित्र पक्ष निवडणुका लढता त्या ३००-४०० कपडा मिल मालकांच्या फायद्यासाठी निर्यातबंदी पुन्हा लादली गेली. पडत्या भावाने कापूस खरेदी होऊ लागला. मिल मालकांना स्वस्तात कापूस, जास्त नफा.  निर्यातबंदी पुन्हा लादणाऱ्या आपल्याच पक्षातील मित्रपक्षातील सहकार्यांना रोकु न शकणारे तुम्ही उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी ऐन निवडणुकीच्या आसपास खूप धावून आले. धन्यवाद ! तुम्ही तुमची नाटकबाजी सुरु ठेवा... आमची भाबडी जनता उद्या तुम्हाले पंतप्रधान बनविल.नाचा.

बेभरवश्याचा पाऊस, सतत दगा देणारे बाजारभाव, कर्जाचे डोंगर आणि रक्त शोषणारे 'लोकांनी, लोकांसाठी, लोकांनीच चालवलेले' सरकार... या सर्वांत, शेतीप्रधान देशातील शेतकरी रक्ताचे आसू रडतोय. धोरणात्मक निर्णय घेऊ शकणारे तुम्ही मतांसाठी रस्त्यावर नौटंकी आणि नाचगाण करताय. भले शाब्बास. आन या बालसुलभ चाळ्यांच कौतुकही फार. हि कथा एका पिकाची किवा एका राज्याची किंवा एका शेतकऱ्याची नाही - सगळीकडेच स्वार्थापोटी शेतकऱ्याचा बळी देण्यात आलाय. महिन्याचा पगार उचलून शेतकऱ्यांच्या अगतिकतेला दुबळेपणा म्हणवणार्या माझ्या मित्रांनो जरा जमिनीवर या... या मातीत तुमचीही मुळं घट्ट रुतू द्या... मगच तुम्हाला या आईच न तिच्या लेकरांचा दुखं कळेल. 

आता शेतकऱ्याचा मरणाला जबाबदार असा कोणीच जगला नाही पाहिजे. आता पोशिंदा पहिले जगल ... लढा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा